04/08/2025
#श्रीराम🚩
जोत्याजीराव साळुंखे उर्फ पाटणकर
इ. स. १५७२ चे सुमारास पुन्हा पोर्तुगीज लोकांनी बाणकोटापासून गोवेंपर्यंत समुद्रकांठच्या प्रदेशांत लुटालूट व जाळपोळ आरंभिली, तेव्हा विजापूरचा बादशहा व अहमदनगरचा बादशहा या दोघांनीं चौल व गोवें ह्या दोन शहरीं पोर्तुगीज लोकांवर स्वारी केली, विजापूरच्या बादशहानें गोव्यांस वेढा दिला; त्यावेळेस दंतागिरीचे देशमुख नागोजीराव साळुंखे यांचे पुत्र त्या समयीं त्यांच्या बरोबर होते, त्यांनीं मोठा पराक्रम केला. जोत्याजीराव हे शूर व धाडसी होते, त्यांना त्यावेळीं पांचशें स्वारांचें आधिपत्य असून बादशहापर्यंत त्यांची कीर्ति गेली होती. गोवें शहरास वेढा घातल्यानंतर लढाई सुरू झाली व ती बरेच दिवस चालली होती. एके प्रसंगी जोत्याजीरावांच्या स्वारांची फळी ज्या बाजूस होती, त्या बाजूवर पोर्तुगीज लोकांनी मोठ्या निकराने हल्ला केला, तेव्हा जोत्याजीराव आपल्या स स्वारांसह एकदम तुटून पडले व कत्तल सुरु केली यामुळे पोर्तुगीज मागे हटले व त्यांचा फार नाश झाला. हें पराक्रमाचें वर्तमान ऐकून बादशहा फार खुष झाला. पुढे बादशहानें तो वेढा कांही कारणाने उठविला व तो विजापुरास सैन्यासह निघून गेला.
पुढें वारणेच्या पलीकडील कांहीं डोंगरी मूलखांत रामोशी वगैरे लोक सरकार सारा न देता नेहमी दरवडे वगैरे घालून फार त्रास देत असत, ही बातमी बादशहाच्या कानीं आली. जोत्याजीराव साळुंखे यांनी विनंती केली की, 'मी तिकडे जाऊन बंदोबस्त करितो.' हें ऐकून बादशहा खूष होऊन त्यानें पाटण महालांतील साठ गांवची देशमुखी वतनाची सनद जोत्याजीराव यांस देऊन त्यांना तिकडील मुलखाचा बंदोबस्त करण्याकरितां पाठविलें. अशा रीतीनें जोत्याजीरावांनी पाटण महालाची देशमुखी मिळविली. या नव्या वतनानामुळे त्यांना व त्यांचे पुढील वंशजांस 'पाटणकर' असें म्हणू लागले व त्याच उपनांवानें आजही ते प्रसिद्ध आहेत.
संदर्भ:- गोपाळ दाजीबा दळवीकृत मराठा कुळाचा इतिहास
संकलक:- सिध्देश लक्ष्मी दादासो पवार
( खालील जोत्याजीरावंचा फोटो विचारल्याशिवाय कोणीही वापरू नये)
#सरदार #सरदारपाटणकर #पाटण